राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी अकाली निधन झाल्याने संपूर्ण राज्यभरात सध्या शोकाकुल वातावरण आहे. अश्यातच रूपालीताई ठोंबरे यांनी ‘दादांचा घात झाला की अपघात’ असा संशय व्यक्त करणारी पोस्ट केली आहे.

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीच्या सकाळी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मात्र या अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “हा अपघात होता की घातपात?” असा प्रश्न उपस्थित करत या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी भावना व्यक्त करणारी पोस्ट त्यांनी सोशल मिडियावर केली आहे.
अजितदादा पवार २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे विमानाने जात असताना बारामतीजवळ विमान कोसळून हा अपघात झाला होता. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची बातमी समजताच राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आणि नागरिक बारामतीत दाखल झाले. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात उशिरापर्यंत अंत्यदर्शनासाठी नागरिकांची गर्दी सुरू होती. दुसऱ्या दिवशी काटेवाडी येथील निवासस्थानी अजित दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थित राहून पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. फ्लाइटची वेळ, पायलट बदल आणि सुरक्षा प्रक्रियेबाबत सविस्तर व पारदर्शक माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. “हा अपघात होता की घातपात?” असा प्रश्न उपस्थित करत या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे.

It’s horrible