(Team India Trophy Controversy) टी-२० विश्वचषकाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने ट्रॉफी हनुमान मंदिरात नेल्याने माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी टीम इंडिया वर गंभीर स्वरूपाची टीका केली आहे.

अहमदाबाद: माजी भारतीय क्रिकेटपटू आणि तृणमूल कॉँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद (Kirti Azad) यांनी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऐतिहासिक विजयानंतर स्टेडियममधील हनुमान मंदिरात ट्रॉफी घेऊन गेलेल्या भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) त्यांनी टीका केली. (Team India Temple Controversy)
सूर्यकुमार यादव ट्रॉफी घेऊन मंदिरात
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये आझाद यांनी विश्वचषक ट्रॉफी मंदिरात का नेण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, “भारतीय क्रिकेट संघ सर्व धर्मांच्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो. ही ट्रॉफी सर्व भारतीयांची आहे, मग त्यांचा धर्म कोणताही असो. राष्ट्रीय क्रिकेट संघात वेगवेगळ्या धर्माचे खेळाडू असतात आणि ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात.”
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी ट्रॉफी सोबत घेऊन मंदिरात प्रार्थना केली. मंदिर भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले गेले. भारतीय क्रिकेट संघाने बीअर आणि अल्कोहोलने आनंदोत्सव साजरा न करता मंदिरात जाऊन आनंद साजरा केल्याबद्दल काहीनी संघाचे कौतुक केले आहे.
१९८३ चा विश्वचषक विजय
आझाद यांनी कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा उल्लेख केला आणि म्हटले की, त्यावेळी क्रिकेट संघात वेगवेगळ्या धर्माचे खेळाडू होते आणि हा विजय राष्ट्रीय कामगिरी म्हणून साजरा केला गेला.
…तर ट्रॉफी मशीद, चर्च किंवा गुरुद्वाऱ्यात का नेली जात नाही?
आझाद यांनी पुढे प्रश्न उपस्थित करत विचारले की, “भारतीय क्रिकेट ट्रॉफी एखाद्या विशिष्ट धार्मिक स्थळी का नेली जाते? जर मंदिरात नेली जाते, तर ती मशीद, चर्च किंवा गुरुद्वाऱ्यात का नेली जात नाही? त्यांच्या मते, भारतासारख्या बहुधर्मीय देशात राष्ट्रीय संघाच्या विजयाचे प्रतीक असलेली ट्रॉफी एका धर्मापुरती मर्यादित ठेवणे योग्य नाही.”
त्यांनी असेही म्हटले की, भारतीय संघातील मुस्लिम वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कधी ट्रॉफी मशिदीत नेली नाही, तसेच ख्रिश्चन पार्श्वभूमी असलेल्या विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन यांनी ती चर्चमध्ये नेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय संघाच्या विजयाचा उत्सव सर्वसमावेशक पद्धतीने साजरा व्हायला हवा.
कीर्ती आझाद यांची सोशल मीडिया पोस्ट:
टीम इंडियाला लाज वाटली पाहिजे! जेव्हा आम्ही १९८३ मध्ये Kapil Dev यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला, तेव्हा आमच्या संघात हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्माचे खेळाडू होते. आम्ही ती ट्रॉफी आपल्या धार्मिक जन्मभूमीत, आपल्या मातृभूमीत, भारत, भारतवर्ष, हिंदुस्तानमध्ये आणली.
भारतीय क्रिकेटची ट्रॉफी अशी का ओढत नेली जात आहे, हे नेमकं काय चाललं आहे?
मशीद का नाही? चर्च का नाही? गुरुद्वारा का नाही?
हा क्रिकेट संघ भारताचे प्रतिनिधित्व करतो तो सूर्यकुमार यादव किंवा जय शहा यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत नाही!
मोहम्मद सिराज कधी ट्रॉफी मशिदीत घेऊन गेला नाही. संजू सॅमसन कधी ती चर्चमध्ये घेऊन गेला नाही. उलट त्याने या स्पर्धेत मोठी भूमिका बजावली आणि तो ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ ठरला आहे. ही ट्रॉफी १.४ अब्ज सर्व धर्मीय भारतीयांची आहे. तो एका धर्माचा विजय सोहळा नाही.
हे सुद्धा वाचा: टिपू सुलतानने सावरकरांसारखी इंग्रजांना ‘लव्हलेटर’ लिहिली नाहीत, त्यांच्या अंगठीत…

